
Image Source:(Internet)
दुबई : दुबईतील एमिरेट्स रोडवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय आणि श्रीलंकन कामगारांच्या कुटुंबीयांना यूएईस्थित भारतीय उद्योजक डॉ. शमशीर वायलील यांनी दिलासा दिला आहे. त्यांच्या पुढाकारातून जाहीर करण्यात आलेली 2.6 कोटींची आर्थिक मदत आता प्रभावित कुटुंबांपर्यंत पोहोचली असून, प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला 26 लाखांची मदत देण्यात आली आहे.
या दुर्घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला होता. डॉ. शमशीर यांच्या कार्यालयातील प्रतिनिधींनी तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि श्रीलंकेतील पीडित कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करत आर्थिक मदत सुपूर्द केली आणि भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
शिक्षणासाठीही विशेष मदत-
फक्त आर्थिक सहाय्य देऊन न थांबता, मृत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबाच्या गरजांचा स्वतंत्र आढावा घेऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अपूर्ण राहिलेली स्वप्ने-
तेलंगणातील सलीम सय्यद हुसेन, अब्दुल रफीक अब्दुल रहीम आणि तिरुपती गोल्लापल्ली चंद्रैया हे रोजगाराच्या शोधात यूएईमध्ये गेले होते. कुटुंबासाठी चांगले घर, मुलांचे शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य ही त्यांची स्वप्ने होती. मात्र दुर्दैवी अपघातामुळे ती स्वप्ने अधुरीच राहिली.
उत्तर प्रदेशातील अब्दुल रशीद, मार्कंडेय चौहान आणि मोहम्मद साकिब यांच्या कुटुंबीयांनाही या मदतीचा मोठा आधार मिळाला आहे. मार्कंडेय यांच्या मुलीने नर्सिंगचे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर डॉ. शमशीर यांनी तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला यूएईमध्ये रोजगाराची संधी देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
श्रीलंकेतील कुटुंबालाही मदतीचा हात-
या अपघातात मृत्यू झालेल्या श्रीलंकन नागरिक सामुवेल रेंगासामी यांच्या कुटुंबालाही आर्थिक सहाय्य देण्यात आले. ते कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मुलगी असा परिवार आहे.
जखमी कामगारांनाही आर्थिक सहाय्य-
अपघातात जखमी झालेल्या नऊ कामगारांनाही त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे. जखमांची तीव्रता आणि उपचारांचा खर्च लक्षात घेऊन मदतीचे वाटप करण्यात आले. काही कामगारांना यूएईमध्ये प्रत्यक्ष मदत देण्यात आली, तर भारतात परतलेल्या कामगारांच्या बँक खात्यांमध्ये मदत रक्कम जमा करण्यात आली आहे.
मानवतावादी दृष्टिकोनातून राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, संकटग्रस्त कुटुंबांना नव्याने उभे राहण्यासाठी दिलेला विश्वास आणि आधार म्हणूनही पाहिला जात आहे.