
Image Source:(Internet)
परभणी: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना परभणी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पातळीवरील बदलानंतर तब्बल 82 पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वीच पक्षाने परभणीचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती केली होती. या निर्णयानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून त्याचा परिणाम म्हणून सामूहिक राजीनाम्यांचा निर्णय घेण्यात आला.
आनेराव यांना पदावरून दूर केल्याच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना राजीनामे सादर केले आहेत. विशेष म्हणजे, पुढील आठ दिवसांत हा निर्णय मागे न घेतल्यास सदस्यत्वाचा देखील राजीनामा देण्याचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे पक्षातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संजय जाधव यांच्याशी निकट संबंध असलेल्या आनेराव यांच्यावर कारवाई झाल्याने हा वाद अधिकच चिघळल्याचे बोलले जात आहे. शिवसेना भवन येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.
या बैठकीला काही प्रमुख पदाधिकारी गैरहजर राहिल्याचेही समोर आले होते. त्यानंतरच पक्षाने कठोर पाऊल उचलत जिल्हा नेतृत्वात बदल केला. मात्र, या निर्णयामुळे परभणीतील संघटनात्मक समतोल ढासळल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.