महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी नवी सुविधा; ‘कम अर्ली-गो अर्ली’मुळे कामावरून लवकर जाण्याची मुभा!

    10-Mar-2026
Total Views |
 
women employees
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून आता महिला (Women) कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” ही सुविधा लागू करण्याची घोषणा विधान परिषदेत केली.
 
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या नव्या निर्णयानुसार महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ दरम्यान कार्यालयात उपस्थित राहून नियमित वेळेपेक्षा आधी काम सुरू करता येणार आहे. त्यांनी जितका वेळ आधी काम केले, तितक्याच वेळेपूर्वी संध्याकाळी कार्यालयातून निघण्याची सवलत मिळणार आहे. साधारणपणे ३० मिनिटे लवकर घरी जाण्याची मुभा या निर्णयातून मिळेल.
 
गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळेल, तसेच त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी होतील, असेही त्यांनी सांगितले.
 
महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राज्यात विविध योजना राबविल्या जात असल्याची माहिती देताना त्यांनी ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’ आणि ‘लखपती दीदी’ या योजनांचा उल्लेख केला. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी ‘उमेद मॉल’, ‘उमेद मार्ट’ आणि ‘महालक्ष्मी सरस’ यांसारखे उपक्रम राबविण्यात येत असून या उत्पादनांची ऑनलाइन विक्रीही सुरू करण्यात आली आहे.
 
तसेच अंगणवाडी केंद्रांमध्ये सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील १७ हजार २५४ अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट स्थानक आणि बोरिवली स्थानक येथे सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आल्याचेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.