महाशिवरात्रीनिमित्त अनोखा उपक्रम: मथुरेतून काशीत पोहोचला बाबा विश्वनाथांचा शृंगार

    09-Feb-2026
Total Views |

Baba VishwanathImage Source:(Internet) 
मथुरा (उत्तर प्रदेश):
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर काशी आणि ब्रजभूमी यांच्यातील आध्यात्मिक नातं अधिक दृढ करणारा एक अनोखा धार्मिक उपक्रम पाहायला मिळणार आहे. काशी विश्वनाथ धामात विराजमान भगवान शिव आणि माता पार्वती यांना श्रीकृष्णाची नगरी मथुरा (Mathura) येथून पाठवलेले दिव्य वस्त्र, अलंकार व शृंगार साहित्य प्रतीकात्मक स्वरूपात अर्पण करण्यात येणार आहे. यासोबतच फळे, मिठाई व मेव्यांचा नैवेद्यही अर्पण केला जाणार आहे.
 
श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थेचे सचिव कपिल शर्मा आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य गोपेश्वरनाथ चतुर्वेदी यांनी माहिती दिली की, ही पावन शृंगार सामग्री रविवारी विधीवत मथुरेतून वाराणसीकडे रवाना करण्यात आली असून ती सुरक्षितरीत्या काशी विश्वनाथ धामात पोहोचली आहे.
 
त्यांनी सांगितले की, भगवान शिव व माता गौरींसाठी पाठवण्यात आलेली वस्त्रे, अलंकार, इत्र, शृंगार साहित्य, लाडू, मेवे आणि फळे भव्य शोभायात्रेद्वारे काशीला पाठवण्यात आली. ही शोभायात्रा अन्नपूर्णेश्वर महादेव मंदिरापासून सुरू होऊन श्रीकेशवदेवजी, माता योगमाया मंदिर आणि श्रीकृष्ण गर्भगृह मार्गे श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुख्य द्वारातून वाराणसीकडे प्रस्थान केली. ढोल-ताशे, मृदंग, मंजीरे आणि बँडच्या मंगल निनादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
 
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा धार्मिक उपक्रम काशी विश्वनाथ धामचे मुख्य कार्यपालक अधिकारी विश्वभूषण यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. ब्रज आणि काशी यांच्यातील आध्यात्मिक एकतेला अधिक बळ देणे, तसेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांच्या भक्तांना विशेष आध्यात्मिक अनुभूती देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
 
महाशिवरात्रीचे महत्त्व सांगताना त्यांनी नमूद केले की, शास्त्र आणि पुराणांनुसार हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पवित्र विवाहाचे प्रतीक मानला जातो. याच रात्री शिवलिंगाचा प्राकट्य झाला, अशी श्रद्धा असून त्यामुळे हा पर्व शिवभक्तांसाठी विशेष आस्थेचा केंद्रबिंदू आहे.
 
गोपेश्वरनाथ चतुर्वेदी यांनी पुढे सांगितले की, ब्रजभूमीत भगवान शिव बाबा भूतेश्वरनाथ स्वरूपात कोतवाल म्हणून विराजमान आहेत. त्या पवित्र भूमीतून पाठवण्यात आलेला हा प्रसाद महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी विशेष आध्यात्मिक आनंद आणि भक्तिभाव वाढवणारा ठरणार आहे.