भारत-अमेरिका व्यापार करारावरून राजकारण तापले; सचिन पायलट यांची केंद्रावर टीका

    19-Feb-2026
Total Views |
 
India-US trade
 Image Source:(Internet)
मुंबई :
भारत-अमेरिका (India-US) व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या करारामुळे देशातील कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
 
पायलट यांनी आरोप केला की हा करार दबावाखाली करण्यात आला असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी संघटना किंवा संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करण्यात आलेली नाही. परदेशातून मोठ्या प्रमाणावर कृषीमाल आयात झाल्यास देशांतर्गत शेतकऱ्यांना तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.
 
विशेषतः लहान व सीमांत शेतकऱ्यांवर या कराराचा सर्वाधिक परिणाम होईल, असे नमूद करत त्यांनी सांगितले की, परदेशी कृषीउत्पादनांच्या वाढत्या आयातीमुळे स्थानिक उत्पादनांची मागणी घटू शकते. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि बाजारातील हिस्सा कमी होण्याची शक्यता आहे.
 
लहान शेतकऱ्यांपुढे आर्थिक आव्हान-
आगामी काळात कोट्यवधी रुपयांच्या कृषीमालाची आयात होऊ शकते, असे संकेत देत पायलट म्हणाले की, यामुळे देशातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडू शकतात. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
किरन रिजिजू यांच्या विधानावर आक्षेप-
दरम्यान, केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही पायलट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विधान अशोभनीय व निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी मंत्रीांनी ते विधान मागे घ्यावे, अशी मागणी केली.
 
भारत-अमेरिका व्यापार कराराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.