युवांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ – डॉ. मनाली क्षीरसागर

    14-Feb-2026
Total Views |
-नागपुरात चौथ्या राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदाचे उद्घाटन संपन्न

Dr Manali KshirsagarImage Source:(Internet) 
नागपूर :
विकासार्थ विद्यार्थी आणि पवरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील विधान भवनात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेला उत्साहात सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर (Dr Manali Kshirsagar) यांच्या हस्ते झाले.
 
देशभरातील विविध विद्यापीठांमधून सुमारे २०० प्रतिनिधी या युवा संसदेत सहभागी झाले आहेत. उद्घाटन समारंभाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे राष्ट्रीय सह-संगठन मंत्री श्री देवदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकासार्थ विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय संयोजिका कु. पायल राय यांनी केले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद २०२६ हा उपक्रम भारतातील युवांमध्ये हरित नेतृत्व विकसित करण्याचा आणि पर्यावरण संरक्षणाबाबत ठोस कृतीची भावना निर्माण करण्याचा परिवर्तनकारी प्रयत्न आहे. विकासार्थ विद्यार्थ्यांतर्फे राबविण्यात येणाऱ्या "स्क्रीन टाइम ते ग्रीन टाइम" या मोहिमेचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. या मोहिमेद्वारे युवांना डिजिटल माध्यमांपासून दूर राहून निसर्गाशी अधिक जवळीक साधण्याचे आवाहन केले जात आहे.
 
उद्घाटन सत्रात डॉ. मनाली क्षीरसागर म्हणाल्या की, राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद युवांमध्ये पर्यावरणाबाबत सजगता निर्माण करेल. पर्यावरणासमोरील गंभीर आव्हानांवर संवाद, कृती आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे मार्ग शोधण्यासाठी ही युवा संसद एक गतिमान व्यासपीठ ठरेल.
 
विशेष पाहुणे श्री देवदत्त जोशी यांनी विकासार्थ विद्यार्थी उपक्रमांतर्गत जल, जन, जंगल, जमीन आणि प्राणी या पाच ‘ज’ क्षेत्रांवर सकारात्मक दृष्टीकोनातून कार्य सुरू असल्याचे सांगितले. युवकांनी पुढाकार घेतल्यास समाज शाश्वत विकासाच्या दिशेने निश्चितच वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
१४ फेब्रुवारी रोजी उद्घाटनानंतर मॉक संसद सत्राचे आयोजन करण्यात आले. तर १५ फेब्रुवारी रोजी “भारताच्या पाच आयामी परिवर्तनाचा आढावा आणि जलवायु शासनात पारिस्थितिक बुद्धिमत्तेचा उपयोग” तसेच “कॉप ३० मध्ये भारत आणि जगाची भूमिका : भारतीय सभ्यतागत स्थिरतेच्या मूल्यांवर आधारित जागतिक जलवायु नेतृत्व” या विषयांवर दोन प्रमुख सत्रे पार पडणार आहेत.
 
या प्रसंगी नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री वामन तुर्के, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. श्रीकांत पर्बत, विदर्भ प्रांत मंत्री श्री देवाशीष गोतरकर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.