स्थानिक स्वराज्य निवडणुकांना वेग; जिल्हा परिषद–पंचायत समितींचा कार्यक्रम आज जाहीर होणार?

13 Jan 2026 15:22:33
 
Local government elections
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत (Election) अखेर हालचाली तीव्र झाल्या आहेत. प्रशासकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कारभाराला विराम लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज, मंगळवारी (१३ जानेवारी २०२६) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात ही परिषद पार पडणार आहे.
 
या पत्रकार परिषदेत निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असून, आचारसंहिता कधीपासून लागू होणार, मतदान कोणत्या तारखांना होणार आणि मतमोजणीचा संभाव्य दिवस कोणता असेल, याची माहिती दिली जाण्याची अपेक्षा आहे. मतदार याद्या आणि प्रभाग रचना पूर्ण झाल्याने निवडणूक प्रक्रियेतील पुढचा टप्पा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.
 
दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णायक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. याआधी ३१ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय कारणांमुळे आयोगाने मुदतवाढ मागितली होती.
 
निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचा विचार असून, पहिल्या टप्प्यात आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत असलेल्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचा कार्यक्रम आज जाहीर होऊ शकतो. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा निर्णय २१ जानेवारी रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीनंतर घेतला जाण्याची शक्यता आहे.
 
एकंदर पाहता, अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर खुला होताना दिसत आहे. आजच्या पत्रकार परिषदेकडे राजकीय पक्षांसह ग्रामीण भागातील नागरिकांचेही लक्ष लागले असून, राज्याच्या ग्रामीण राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0