प्रशासन सतर्क;९ ते ११ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

08 Sep 2025 16:07:02
 
heavy rains
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
मान्सूनच्या जोरदार सरींमुळे देशातील अनेक राज्यांत पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात गणेश विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळला, तर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. नद्या, तलाव आणि धरणे ओसंडून वाहत आहेत, शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत आणि हजारो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

राजस्थानात मुसळधार पावसाचा अंदाज-
भारतीय हवामान विभागाने पाली, जोधपूर, बारमेर, जालोर, सिरोही आणि उदयपूर जिल्ह्यांसाठी ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत प्रशासनाने शाळा व सरकारी तसेच खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. स्थानिक नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक हालचाल टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
दिल्ली-एनसीआर हवामान-
दिल्ली आणि आसपासच्या NCR भागात ९ आणि १० सप्टेंबर रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे. ११-१२ सप्टेंबरदरम्यान हवामान ढगाळ राहील व हलक्या सरी पडतील. यामुळे उकाड्यातून काहीसा दिलासा मिळू शकतो; मात्र वाहतुकीवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये गंभीर पूरस्थिती-
पंजाबमध्ये २३ जिल्ह्यांमधील ४ लाखांहून अधिक लोक पुरामुळे बाधित झाले आहेत. अनेक गावे पाण्याखाली गेली असून कोट्यवधी रुपयांचे कृषी नुकसान झाले आहे. मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून हवामान खात्याने अजूनही पावसाचा धोका कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
उत्तराखंडात भूस्खलनाचा इशारा-
उत्तराखंडमधील डेहराडून, हरिद्वार, जोशीमठ, लॅन्सडाउन आणि मसूरी परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नद्यांमध्ये पाणीपातळी वाढू शकते, त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांनी नदीकिनारी जाणे टाळावे, असे प्रशासनाने बजावले आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका असल्याने विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले गेले आहेत.
 
हवामान विभागाने पुढील काही दिवस देशातील विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.**
Powered By Sangraha 9.0