Image Source;(Internet)
नागपूर :
खापरखेडा परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. केवळ खंडणीसाठी (Ransom) एका ११ वर्षीय निरागस मुलाचे अपहरण करून त्याची निर्दयी हत्या करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकरराव चव्हाण इंग्रजी शाळेत सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाचे काही दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले. पैशासाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने हे अपहरण झाले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने आरोपींनी त्याचा गळा आवळून निर्घृण खून केला. बुधवारी चंकापूर परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे खापरखेडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिस तपासात उघड झाले की या प्रकरणामागचा सूत्रधार हा मुलाचाच शेजारी आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून या गुन्ह्याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, मृत मुलाचा मृतदेह पोलिस ठाण्यात आणत कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी एकत्रित निदर्शने केली. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.