(Image Source:Internet)
धाराशिव :
हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा (Banjara) समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत पवन गोपीचंद चव्हाण (वय 32) या तरुणाने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने थेट आपल्या मागणीची तक्रार व्यक्त केली होती.
पवन हा लातूर जिल्ह्यातील शाहू कॉलेजचा बी.कॉम पदवीधर असून सध्या बेरोजगार होता. तो बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नांवर सक्रिय होता आणि काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील जिंतूर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. घर परतल्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत आरक्षणाविषयी चर्चा करत होता; मात्र सकाळी अचानक बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेनंतर कुटुंबीय आणि समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पवनच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुले आहेत. बंजारा समाजात संताप आणि तणाव निर्माण झाला असून, “मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण आमच्याकडे दुर्लक्ष होतंय,” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की अशा घटनांना रोखण्यासाठी सरकारने तातडीने समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा आरक्षणासाठी चळवळी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.