मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा;सुप्रिया सुळे यांची महायुती सरकारला विनंती

    01-Sep-2025
Total Views |
 
Supriya Sule
 (Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रविवारी महायुती सरकारला विशेष विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली.
 
सुळे म्हणाल्या, "लोकशाहीत संवाद व्हावा अशी माझी मागणी आहे. महाराष्ट्राला मोठा जनादेश दिला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून तातडीने निर्णय घ्यावा. 'सबका साथ, सबका विकास' व 'सबका विश्वास' हे सरकारचेच धोरण आहे, तर ते प्रत्यक्षात आणावं," असं आवाहन त्यांनी सरकारला केलं.
 
दरम्यान, मुंबई पोलिसांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आणखी एक दिवस आंदोलन सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. पाटील गेल्या तीन दिवसांपासून उपोषणावर असून, ओबीसी प्रवर्गाखाली मराठ्यांना १० टक्के आरक्षण मिळेपर्यंत पाणी न पिण्याची शपथ त्यांनी घेतली आहे.
 
या आंदोलनामुळे महायुती सरकारवर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय मंत्रिमंडळ समिती स्थापन करून सरकारने संबंधितांशी चर्चा सुरू केली आहे. आता सरकार विशेष अधिवेशन बोलावणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.