राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष;“गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी दुमदुमले वातावरण

27 Aug 2025 11:44:31
 
Ganpati Bappa Morya Ganeshotsav
 (Image Source-Internet)
नागपूर:
आजपासून महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) जल्लोष अधिकृतरीत्या सुरू झाला आहे. सार्वजनिक मंडळांपासून ते प्रत्येकाच्या घरापर्यंत बाप्पाचे आगमन उत्साहात होत असून, “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” या गजरांनी संपूर्ण राज्य भारावून गेले आहे.
 
पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणुकांची रंगत
मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये सकाळपासूनच आगमन मिरवणुका सुरू आहेत. ढोल-ताशांचा गडगडाट, संबळ-लेझीमचा नाद आणि भक्तांच्या नृत्याने रस्ते उत्साहाने फुलले आहेत. यंदा डीजे आणि लेझर शोला मागे टाकत पारंपरिक वाद्यांना अधिक पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे या मिरवणुकांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसतोय. विद्यार्थी, तरुण आणि व्यावसायिक वर्गही या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले असून, त्यामुळे नव्या पिढीचा सांस्कृतिक वारशाशी दुवा अधिक घट्ट होताना दिसतो.
 
गणेश स्थापनेसाठी शुभ वेळ
चतुर्थी प्रारंभ : मंगळवार, २६ ऑगस्ट दुपारी १.५४ ते बुधवार, २७ ऑगस्ट दुपारी ३.४३ पर्यंत
स्थापना व पूजेचा मुहूर्त : बुधवार, २७ ऑगस्ट सकाळी ११.०५ ते दुपारी १.४० पर्यंत
भक्तांना या काळात गणेशपूजेसाठी जवळपास अडीच तासांचा शुभ मुहूर्त उपलब्ध असेल.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
गणेशोत्सवात होणाऱ्या प्रचंड गर्दीला तोंड देण्यासाठी पोलिस प्रशासनाने सर्वंकष सुरक्षा आराखडा आखला आहे.
 
शहरभर विशेष पेट्रोलिंग सुरू राहील.
गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड आणि श्वानपथकं तैनात केली जातील.
संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई होईल.
सोशल मीडियावरील अफवांवर पोलिसांची करडी नजर असेल.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक ऐक्याचा पर्व मानला जातो. परंपरा, श्रद्धा आणि सुरक्षिततेचा संगम साधत महाराष्ट्र आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यास सज्ज झाला आहे.
Powered By Sangraha 9.0