(Image Source-Internet)
नागपूर :
उपराजधानी नागपूर (Nagpur) जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकारने सहा नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. यात तीन ठाणे शहरात तर तीन ठाणे ग्रामीण भागात कार्यान्वित होणार आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये एक स्वतंत्र पोलीस झोन उभारला जाणार आहे. या झोनअंतर्गत अधिकाऱ्यांची नेमणूक होईल, तसेच वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवर विशेष लक्ष दिले जाईल. शहरात कलमणा, भीलगाव आणि कनोरीबारा येथे पोलीस ठाण्यांची उभारणी होईल.
दरम्यान, ग्रामीण परिसरातही नागरिकांच्या सुरक्षेसाठी कामठी तालुक्यातील बडोदा, कळमेश्वर तालुक्यातील मोहपा आणि कुही तालुक्यातील पाचगाव येथे नवीन पोलीस ठाणे सुरू होणार आहेत.
बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, लोकसंख्येतील वाढ, शहरी विस्तार आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत. ग्रामीण ठिकाणी नवी ठाणे सुरू झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळेल, तर शहरातील ठाणे सायबर गुन्हे, वाहतूक नियंत्रण आणि शहरी गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक प्रभावी ठरतील.
नागपूरला सुरक्षित आणि प्रगत शहर बनवण्याच्या दृष्टीने सरकारकडून सतत उपक्रम राबवले जात आहेत. सीसीटीव्ही नेटवर्कचा विस्तार, एआय-आधारित देखरेख प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे पोलीस दल अधिक सक्षम होईल.
नवीन ठाण्यांमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीची भावना निर्माण होईल, तर नागरिकांचा सुरक्षिततेवरील विश्वास अधिक घट्ट होईल.