(Image Source-Internet)
बुलढाणा :
राज्यातील महायुती सरकारच्या काही महत्त्वाच्या आणि लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मिळणारा निधी मागील दहा महिन्यांपासून वितरित झालेला नाही, असा दावा शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी गोटात चर्चा रंगली आहे. मात्र, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा दावा फेटाळून लावत “आमदारांना निधी नियमितपणे दिला जातो” असे म्हटले आहे.
गायकवाड यांनी सांगितले, “काही लोकप्रिय योजनांमुळे राज्य सरकार आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे दहा महिन्यांपासून कोणत्याही आमदाराला निधी मिळालेला नाही. तथापि, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच परिस्थिती सुधारेल, असे आम्हाला आश्वासन दिले आहे.”
या दाव्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले, “आमदारांना निधी मिळत नाही, हे खरे नाही. सर्व आमदारांना निधी दिला जात आहे. माझ्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या एसटी डेपो किंवा एसटी स्टँडसाठी निधीची तरतूदही वेळेवर केली जाते.”
राज्यात अशी चर्चा आहे की ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर मोठा ताण आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महायुती सरकारची ही महत्वाकांक्षी योजना असली तरी तिच्या अंमलबजावणीत सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विभागांदरम्यान निधीचे फेरवाटप करून खर्च भागवला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.