काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार का ? शशी थरुर म्हणाले...

    05-Jun-2025
Total Views |
 
Shashi Tharoor
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला असून, ते सध्या अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत.
 
या शिष्टमंडळामार्फत भारताचं दहशतवादविरोधी धोरण आणि पाकिस्तानविषयीची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट केली जात आहे. मात्र, थरुर यांची ही भूमिका काँग्रेसच्या काही नेत्यांना रुचलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत की, शशी थरुर काँग्रेस सोडणार का? ते भाजपमध्ये प्रवेश करणार का?
 
या चर्चांना आता थरुर यांनीच उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,मी लोकसभेचा निवडून आलेला खासदार आहे. माझ्या कार्यकाळाला अजून चार वर्षं बाकी आहेत. त्यामुळे अशा शंका उपस्थित करू नयेत. त्यांच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे सध्या तरी भाजप प्रवेशाच्या चर्चांना विराम मिळाल्याचं दिसत आहे.
 
काँग्रेसमध्ये नाराजी, भाजपकडून कौतुक-
शिष्टमंडळातील सहभागामुळे काँग्रेसमधील काही नेते थरुर यांच्यावर टीका करत आहेत. काँग्रेस नेते उदित राज यांनी थरुर यांच्यावर निशाणा साधत म्हटलं,काँग्रेसने त्यांना खूप काही दिलं, पण आता ते पक्षविरोधी भूमिका घेत आहेत.
 
तर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी थरुर यांच्या पुस्तकातील 'सर्जिकल स्ट्राईक' संदर्भातील विधानावरून त्यांच्यावर टीका केली आहे.
 
दुसरीकडे, भाजपने मात्र थरुर यांचं कौतुक केलं आहे. विरोधी पक्षात असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या बाजूने ठाम भूमिका मांडल्याबद्दल भाजप नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
थरुर भाजपमध्ये जाणार की नाही यावर चर्चांना सध्या विराम मिळालेला असला, तरी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि भाजपकडून मिळणारी पाठिंबा यामुळे आगामी काळात राजकीय घडामोडींचा वेग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.