(Image Source-Internet)
मुंबई :
मुंबईवर अदानींसारख्या उद्योगपतींचे अतिक्रमण सुरू असून, केंद्र सरकारच्या मदतीने ही शहरं मराठी माणसाच्या हातून काढून घेण्याचा डाव सुरू आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, “मदर डेअरीचा भूखंड, धारावी प्रकल्प अशा मोठ्या मालमत्ता अदानींसारख्या उद्योगसमूहांना देण्यात आल्या. ही मुंबई १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली आहे. ती कोणा उद्योगपतीच्या ताब्यात जाण्याची आम्ही परवानगी देणार नाही.”
मनसेसोबत युतीला संमतीचा सूर-
राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी वेगळी वाट निवडली, पण आता सगळ्यांनी एकत्र यायची वेळ आली आहे, असंही राऊत म्हणाले. “उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आम्ही सगळे मनसेसोबत युतीबाबत सकारात्मक आहोत. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत.”
राजकीय चर्चांवर राऊतांचा पलटवार-
शिवसेनेतील पाच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांवर राऊत म्हणाले, “या अफवा आहेत. उलट शिंदे गटातील सहा खासदार भाजपाच्या संपर्कात आहेत, आणि २२ आमदार अजित पवारांकडे जाण्याच्या तयारीत आहेत – अशा अनेक गोष्टी आमच्याकडेही आहेत. पण अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका.”