(Image Source-Internet)
बंगळुरू :
आयपीएल २०२५ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयोजित केलेल्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरसीबीसह इव्हेंट मॅनेजर ‘डीएनए’, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
क्यूबॉन पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आयपीएलचा अंतिम सामना पार पडल्यानंतर संघाने रॅलीसाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, परवानगी देण्यापूर्वीच RCBने ४ जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत रॅलीची वेळ आणि ठिकाण जाहीर केल्यामुळे हजारो चाहत्यांची गर्दी जमली.
ही सोशल मीडिया पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाल्याने, नियोजनाअभावी जमलेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीसारखी घटना घडली. पोलिसांकडून आरसीबी व्यवस्थापनाला रॅली न घेण्याचा सल्ला दिला गेला होता, पण तो दुर्लक्षित करत सोशल मीडियावरून गर्दीला आमंत्रण देण्यात आलं.
या संपूर्ण प्रकारात आयोजकांनी नियमभंग केल्याचं स्पष्ट होत असून, भारतीय न्याय संहितेतील कलम १०५, १२५(१)(२), १३२, १२१(१), आणि १९० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस तपासात हे ही उघड झाले आहे की सोशल मीडियावर केलेल्या एकाच पोस्टमुळे गर्दीचा विस्फोट झाला. आरसीबी संघाच्या निष्काळजीपणामुळे हजारोंचा जीव धोक्यात आला, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर आरसीबीवर टीकेची झोड उठली असून, प्रशासनाने भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.