(Image Source-Internet)
बंगळुरू :
आयपीएल २०२५ जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या (RCB) सत्कारासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमलेल्या प्रचंड गर्दीने नियंत्रण सुटल्यामुळे भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या अनपेक्षित घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्वसामान्यांना विनामूल्य प्रवेश दिला होता. परिणामी, स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. पाहता पाहता परिस्थिती इतकी बिघडली की सुरक्षारक्षकांनाही परिस्थिती हाताळणे कठीण झाले. पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी लाठीचार्ज केल्यावर अफरातफरी उडाली आणि चेंगराचेंगरी झाली.
प्राप्त माहितीनुसार, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनतर्फे आरसीबीच्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्टेडियममध्ये जागा मर्यादित असल्याने लाखो लोकांनी बाहेरच तळ ठोकला. गर्दीचा ताण इतका वाढला की अनेकांनी गाड्यांवर चढून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहनेही नुकसानीस आली.
दुर्घटनाग्रस्त नागरिकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली असून सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि आयोजकांची निष्काळजीपणा याकडे बोट दाखवले जात आहे.
मुळात आरसीबीच्या विजयानंतर विजय मिरवणुकीचा विचार होता, पण मोठ्या गर्दीची शक्यता लक्षात घेता परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे मैदानातच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. मात्र, आयोजकांनी गर्दीचे योग्य नियोजन केले नसल्यामुळे एक आनंददायी प्रसंग दुर्दैवात परिवर्तित झाला.