सरकारचा मोठा निर्णय; 'ऑपरेशन सिंदूर'वर आता पावसाळी अधिवेशनातच होणार चर्चा

    04-Jun-2025
Total Views |
 
Kiren Rijiju
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
संसदेला लवकरच प्रारंभ होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर' या गाजलेल्या प्रकरणावर चर्चा होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी दिली आहे. हे अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होऊन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
 
रिजिजूंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, “प्रत्येक अधिवेशनाचा स्वतंत्र महत्त्व असतो. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'सह इतर गंभीर आणि महत्त्वाच्या विषयांवरही चर्चेला सरकार तयार आहे. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील.”
 
विशेष अधिवेशन टळलं; सरकारने स्पष्ट भूमिका मांडली-
याआधी १६ विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून 'ऑपरेशन सिंदूर'वर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने त्या मागणीला प्रतिसाद न देता या विषयावर चर्चा नियमित पावसाळी अधिवेशनातच घेण्याचा निर्णय घेतल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
 
सरकारकडून सांगण्यात आलं की, यासाठी कोणतंही स्वतंत्र विशेष अधिवेशन बोलावलं जाणार नाही. 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनातच मांडण्यात येणार आहे. त्यामुळे या संवेदनशील विषयावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.