महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार; मनसे-ठाकरे गट युतीवर आदित्य ठाकरेंचे विधान

04 Jun 2025 16:22:24
 
Aditya Thackeray
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्यामुळे राजकीय घडामोडींना गती मिळाली आहे. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
 
युवानेते आदित्य ठाकरे यांनी अलीकडील पत्रकार परिषदेत सूचक विधान करत, मनसेसोबतच्या संभाव्य युतीला चालना दिली. "महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी जे कोणी आमच्या सोबत येतील, त्यांच्यासोबत आम्ही लढण्यास तयार आहोत," असे ते म्हणाले.
 
यावेळी बोलताना त्यांनी दीपेश म्हात्रे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या संयुक्त आंदोलनाचाही उल्लेख केला. "हे आंदोलन त्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल होतं. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे आणि जनतेच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत," असे त्यांनी स्पष्ट केले.
 
शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत यांनीही युतीच्या चर्चांना पुष्टी देताना म्हटले, "राज ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून उद्धव ठाकरे यांनीही तीच भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे लवकरच या युतीसंदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे."
 
दरम्यान, मनसेकडून यावर अजूनही ठोस प्रतिक्रिया आलेली नसली तरी संदीप देशपांडे यांनी संयत भाषेत उत्तर दिलं. "सकारात्मकतेची भाषा उपयोगाची नाही. कृती दिसली, तरच पुढील वाटचाल शक्य आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.
 
राजकीय वर्तुळात या दोन्ही पक्षांची युती झाल्यास मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये मतदार समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात, असं मत विश्लेषक व्यक्त करत आहेत.
Powered By Sangraha 9.0