(Image Source-Internet)
मुंबई:
शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा रोखठोक शैलीत घणाघाती टीका केली आहे. महाजन हे पक्षफोडीच्या भाजप यंत्रणेतील प्रमुख दलाल असून, त्यांचीच वाणी भाजपला डुबवेल, असा थेट आरोप त्यांनी केला.
राऊतांनी स्पष्टपणे सांगितले की भाजप आता ठेकेदार, दलाल आणि भ्रष्ट प्रवृत्तींनी चालवला जात आहे. “एकेकाळी सुसंस्कृत आणि मूल्याधिष्ठित विचारसरणी असलेला भाजप आता फोडाफोडीचा अड्डा झाला आहे. गिरीश महाजन हे अशा प्रवृत्तीत आघाडीवर आहेत,” असे ते म्हणाले.
सत्तेपासून दूर असताना सोडणार होते राजकारण –
संजय राऊत यांनी आरोप केला की, जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते, तेव्हा गिरीश महाजन स्वतःच राजकारणातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. "त्यांनी काही नेत्यांमार्फत निरोप पाठवला होता की, 'मी गप्प बसतो, बाहेर जातो'," असा गंभीर दावा करत राऊतांनी त्यांना ‘डरपोक’ ही उपाधी दिली.
शिवसेना संपवणे म्हणजे भाजपचा विनाश-
भाजपकडून सातत्याने ठाकरे गटाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला जात असताना राऊतांनी भाजपला इशारा दिला. “शिवसेना संपवण्याचं स्वप्न पाहणं म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेणं. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आणि शिवसेना कितीही प्रयत्न केले तरी संपणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज-उद्धव एकत्र येणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांवर विचारले असता, संजय राऊत म्हणाले, “सुनील प्रभू आमचे आमदार आहेत. काही हालचाली सुरू असतील, तरी त्या योग्य वेळीच स्पष्ट केल्या जातील. आतासाठी त्या गुप्त ठेवणंच योग्य, असेही ते म्हणाले.