(Image Source-Internet)
मुंबई:
भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांत ठाकरे गटाला गंभीर राजकीय धक्का बसू शकतो आणि पक्षाचे अस्तित्व टिकेल की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.
महाजन नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राऊत यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या बैठकीवर भाष्य करताना, राऊत यांच्या विधानांमुळे उद्धव ठाकरेही अस्वस्थ झाले असतील,असे ते म्हणाले. तसेच, "संजय राऊत एकटेच ठाकरे गट संपवायला पुरेसे आहेत,अशी तीव्र टिप्पणी त्यांनी केली.
महाजन यांनी पुढे दावा केला की नाशिकमधील अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहेत. आठ दिवस थांबा, मोठे पक्षांतर घडेल आणि काही पक्ष पूर्णपणे संपुष्टात येतील,असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
या भेटीदरम्यान महाजन यांनी कुंभमेळ्याच्या तयारीबाबतही भाष्य केलं. "मी नाशिकचा पालकमंत्री असल्यामुळे मला बैठकीला बोलावलं गेलं होतं. आमदार आणि खासदारांना निमंत्रण नव्हतं. मुख्यमंत्री उपस्थित असल्यामुळे काही आमदार आले. विशेष म्हणजे, या बैठकीला सर्व १३ आखाड्यांचे महंत हजर होते. हे याआधी कधीही घडलं नव्हतं, असे त्यांनी नमूद केले.