- १५ ऑगस्टनंतर थेट कारवाईचा इशारा
(Image Source-Internet)
मुंबई :
राज्यातील जुनी वाहने वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी एकीकडे दिलासा तर दुसरीकडे कडक इशारा देणारा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र ही मुदत अंतिम असून त्यानंतर नियम तोडणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
ही मुदत तीसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. याआधी एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी मार्च २०२५ पासून जून अखेरपर्यंत देण्यात आली होती. परंतु वाहनधारकांकडून प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे न मिळाल्याने मुदत पुन्हा एकदा वाढवावी लागली.
राज्यातील २.१० कोटी जुन्या वाहनांपैकी केवळ २३ लाख वाहनांवरच HSRP बसवण्यात आल्या असून ही संख्या अत्यंत कमी असल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, "१५ ऑगस्टनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर अंमलबजावणी पथके थेट कारवाई करतील. तथापि, ज्या वाहनधारकांनी १५ ऑगस्टपूर्वी अधिकृत वेबसाइटवरून अपॉइंटमेंट बुक केली असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही."
वाहनधारकांनी https://transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळ बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील चार कोटींपेक्षा अधिक वाहनांपैकी २.१० कोटी वाहनांना HSRP बसवण्याची जबाबदारी तीन कंपन्यांकडे देण्यात आली आहे. डिसेंबर २०२४ पासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, सुरुवातीला वाहनधारकांना चार महिन्यांआधी देण्यात आली होती.