(Image Source-Internet)
सुकमा :
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सुकमा जिल्ह्यात नक्षलविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले आहे. नक्षल चळवळीचा प्रमुख केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या या भागात १६ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे.
या आत्मसमर्पणामध्ये दोन कट्टर विचारांचे नक्षलवादी होते, तर सहा जणांवर तब्बल २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याचबरोबर एका महिला व एका पुरुष नक्षलवाद्यावर प्रत्येकी ८ लाखांचे इनाम होते. हे सर्व नक्षलवादी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होते, आणि त्यांच्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये खटले दाखल आहेत.
नक्षलवाद्यांनी "आत्मसमर्पण धोरण" तसेच "नियाद नेल्ला नर" योजनेअंतर्गत हा निर्णय घेतला. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक किरण चव्हाण, वरिष्ठ पोलीस अधिकारी उमेश गुप्ता, तसेच सीआरपीएफचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, "सुकमामध्ये नक्षलवाद निर्मूलनासाठी सुरू असलेल्या मोहिमेमुळे आणि पोलिस-CRPFच्या सातत्यपूर्ण कार्यवाहीमुळे हे आत्मसमर्पण घडून आले आहे." त्यांनी सांगितले की, आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये ओडिशा आणि बटालियन भागातील नक्षलवादीही आहेत. विशेष म्हणजे, या घटनेनंतर एक संपूर्ण गाव नक्षलमुक्त झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले असून, त्या गावासाठी १ कोटी रुपयांची विशेष मदत प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.