(Image Source-Internet)
नागपूर :
सात दिवसांपासून अन्नत्याग करत प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी अखेर आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आहे. सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवत त्यांनी २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली असून, त्या दिवशीही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
उपोषणामुळे कडूंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली होती. तब्बल चार किलो वजन घटल्याने आणि रक्तस्राव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपानंतर आणि दोन दिव्यांगांच्या उपस्थितीत बच्चू कडूंनी पाणी घेत आंदोलन थांबवलं.
उदय सामंत यांनी आंदोलनातील मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं असून, १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे. तसेच, दिव्यांगांच्या मानधनवाढीवर ३० जूनला विशेष बैठक होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या सर्व बाबींची लिखित हमी सरकारने दिली आहे.
बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे दिव्यांग, शेतकरी, महिलांशी संबंधित अनेक मागण्या सरकारदरबारी पोहोचल्या. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी सरकार जर पुन्हा वाद घालणार असेल, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. १५ जून रोजी नियोजित 'रास्ता रोको' आंदोलनही आता रद्द करण्यात आलं आहे.
आंदोलन थांबवताना बच्चू कडूंनी सरकारला ठाम शब्दांत इशारा दिला की, "आता आम्ही थांबलो आहोत, पण जर फसवणूक झाली, तर मंत्रालयात शिरून ‘प्रहार स्टाईल’ने आंदोलन करू." शिवाय २ ऑक्टोबर ही महात्मा गांधींची जयंती असली, तरी अन्याय झाल्यास भगतसिंगाची भूमिका घेण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.