बच्चू कडू आज अन्नत्याग आंदोलन थांबवणार का? सरकारच्या हालचालींना वेग

    14-Jun-2025
Total Views |
 
Bachchu Kadu
 (Image Source-Internet)
मोझरी :
राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस असून हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या या उपोषणाबाबत आज सरकारकडून कोणती ठोस भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
सरकारकडून हालचालींना वेग –
काल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोझरीच्या गुरुकुंज आश्रमात भेट दिल्यानंतर, आज उद्योगमंत्री उदय सामंत हे स्वतः भेटीला येणार आहेत. याआधीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे तसेच मंत्री संजय राठोड यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत सरकार कोणते निर्णय जाहीर करते, हे उपोषण थांबवले जाते की नाही हे ठरवणारे ठरेल.
 
पोलीस बंदोबस्त आणि तणावपूर्ण वातावरण-
आंदोलनस्थळी शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी असून २०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. काल एका कार्यकर्त्याने विष प्राशन केल्याची गंभीर घटना घडली होती, तर काही कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
 
प्रमुख मागण्या ज्या निर्णायक ठरणार –
शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी
शेतमजुरांना किमान सन्मान्य मजुरी
दिव्यांग नागरिकांना हक्काचे भत्ते
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा आणि निश्चित वेतन
या मागण्यांवरच सरकारची भूमिका ठरेल आणि बच्चू कडू यांचा पुढील निर्णय स्पष्ट होईल.
 
राजकीय पाठिंब्यामुळे आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप-
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर विविध पक्ष व संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ अमरावतीपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करणारा आवाज ठरत आहे.