(Image Source-Internet)
अहमदाबाद:
मी उडी मारली नाही... मी सीटसह बाहेर फेकलो गेलो, हे शब्द आहेत अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकमेव बचावलेले प्रवासी रमेश विश्वकुमार (Ramesh Vishwakumar) यांचे. काल मेघानी परिसरात झालेल्या इतिहासातील सर्वात भीषण विमान अपघातात २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण या भीषण अपघातातून फक्त रमेश विश्वकुमारचाच जीव वाचला.
या दुर्घटनेनंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादच्या रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आणि बचावलेल्या रमेश विश्वकुमार यांची विशेषरित्या भेट घेतली.
घटनेचं वर्णन करताना रमेश म्हणाले, अपघात इतका अचानक झाला की काहीच समजलं नाही. काही क्षणांत मी माझ्या सीटसह हवेत होतो... आणि नंतर जमिनीवर. मला वाटलं, संपलं सगळं... पण मी श्वास घेतोय याची जाणीव झाली.
प्राथमिक उपचार घेत असलेल्या रमेश यांचं म्हणणं आहे की, अनेक जणांचा समज होता की त्यांनी धाडसाने उडी मारली असेल. मात्र, त्यांचा स्पष्ट खुलासा होता. मी काहीच केलं नाही. माझं फक्त नशिब बलवत्तर होतं.
ही दुर्घटना भारतीय विमान वाहतुकीच्या इतिहासातील एक काळी घटना म्हणून नोंदवली जात आहे. अपघातग्रस्त विमानात प्रवास करणारे अनेक विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी जात होते. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक घरांत मातम आहे.