(Image Source-Internet)
अमरावती :
शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला व अन्य वंचित घटकांच्या न्यायहक्कांसाठी उपोषणाला बसलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची प्रकृती आता चिंताजनक वळणावर पोहोचली आहे. उपोषणाचा आज सहावा दिवस असूनही त्यांनी कोणतेही औषधोपचार घेण्यास नकार दिला आहे. आज सकाळी त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या असून, गेल्या सहा दिवसांत अन्नाचा कणही त्यांनी घेतलेला नाही.
डॉक्टरांचा इशारा, कडू ठामच-
आरोग्य पथकाने त्यांच्या प्रकृतीबाबत तातडीचा इशारा दिला असून, किडनी व इतर अवयवांवर ताण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. सलाईन सुरू करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. मात्र बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – "मागण्या मान्य होईपर्यंत औषधोपचार घेणार नाही."
कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न-
या आंदोलनाचे पडसाद प्रहार कार्यकर्त्यांमध्येही तीव्रतेने उमटत आहेत. वरुड तालुक्याचे प्रहार अध्यक्ष अजय चौधरी यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. सध्या त्यांच्यावर वरुडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली जात आहे.
बावनकुळे यांची भेट ठरणार निर्णायक?
राज्याचे महसूल व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज सायंकाळी ५ वाजता उपोषणस्थळी भेट देणार आहेत. काही दिवसांपूर्वी फोनवर झालेल्या चर्चेमुळे कडू नाराज होते. त्यामुळे ही प्रत्यक्ष भेट आंदोलनाच्या पुढच्या दिशेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
कडू यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी
त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना
दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा ₹६,००० मानधन
वंचित घटकांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा
आज सहाव्या दिवशीही सरकारकडून ठोस निर्णय न आल्यामुळे बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम असून, त्यांच्या ‘औषध नको, न्याय हवा’ या घोषणेमागे निर्धार दिसून येतो. राज्यभरातून या आंदोलनाकडे लक्ष लागले असून, आज संध्याकाळी होणाऱ्या भेटीनंतर आंदोलनात काही तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.