(Image Source-Internet)
अहमदाबाद:
संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या अहमदाबाद विमान अपघातातून काहींच्या जीव वाचल्याच्या कहाण्या मन सुन्न करणाऱ्या आहेत. अशाच एका कहाणीची नायिका ठरली आहे अकोल्याची ऐश्वर्या (Aishwarya) तोष्णीवाल. चटकन प्रसंगावधान राखत तिने मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली, ही कथा थरारक आहे, पण त्याहून अधिक प्रेरणादायी आहे.
धूर, आगीचा फैलाव आणि अचानक उडालेली झोप -
‘डीएम अँकोपॅथोलॉजी’चा अभ्यास करत असलेली ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट, अहमदाबाद येथे दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. नुकताच तिने अकोल्यात आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा केला होता आणि काल सकाळी ती पुन्हा अहमदाबादला परतली. रात्रीच्या वेळेस विमान अपघातात ती झोपेत होती, तेवढ्यात एक जोराचा आवाज झाला आणि ती चटकन जागी झाली. जाग येताच समोर फक्त धूरच धूर!
धाडस दाखवून स्वतःचा जीव वाचवला-
क्षणाचाही विलंब न करता, ऐश्वर्याने प्रसंगावधान राखले. घरातले काहीही दिसत नव्हते, धुरामुळे श्वास घेणेही कठीण झाले होते. अशा वेळी तिने स्वतःला एका चादरीत लपेटले आणि अंधाऱ्या, धुरट मार्गातून वाट काढत पाचव्या मजल्यावरून खाली उतरली. चेहरा, हात आणि पाय भाजले गेले, पण अखेर ती जिवंत बचावली.
बाबा, मी वाचले…-
अपघातातून वाचल्यानंतर ऐश्वर्याने थरथरत्या हातांनी लगेच आपल्या वडिलांना, अमोल तोष्णीवाल यांना फोन केला. ते त्या क्षणी अकोल्यातील दुर्गा चौकात आपल्या साड्यांच्या दुकानात होते. मुलीचा फोन येताच त्यांनी दुकान बंद केलं आणि तात्काळ घरी धाव घेतली.
“टीव्हीवर बातमी पाहिली, तेव्हा काळजाचं पानं पानं झालं... पण त्या फोनमुळे आम्ही श्वासातला जीव परत घेतला,” असं अमोल तोष्णीवाल यांनी सांगितलं.
धैर्य आणि प्रसंगावधानाचे कौतुक-
ऐश्वर्याने दाखवलेले धैर्य, तिची शांतता आणि निर्णयक्षमतेमुळे तिचा जीव वाचला. तिच्या या धाडसाची सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. अपघातात जीव गमावलेल्यांच्या दु:खात सामील होत, अशा वाचलेल्या अनुभवांनी मात्र माणसाच्या जगण्याच्या इच्छाशक्तीची ताकद दाखवून दिली आहे.