शेतकऱ्यांसाठी दिलासा; महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता

    08-May-2025
Total Views |
 
Monsoon
 (Image Source : Internet)
मुंबई:
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, यंदा मान्सून (Monsoon) 8 ते 10 दिवस आधी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असून, शेतीसाठीही अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे.
 
IMD च्या रिपोर्टनुसार, मान्सून 13 मे पर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल आणि त्यानंतर 5 ते 6 दिवसांत केरळमध्ये पोहोचेल. त्यानुसार, महाराष्ट्रात मान्सून 5 ते 7 जूनदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.
 
दरवर्षी मान्सून साधारणतः 9 ते 11 जूनच्या दरम्यान दाखल होतो, पण यंदा मान्सूनच्या आगमनाने दक्षिण कोकणात 5 जूनपासून आणि मुंबई-पुण्यात 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
यंदा एल निनोचा प्रभाव नसल्यानं पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या 105% पर्यंत राहू शकते, ज्यामुळे पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना यामुळे खरीप हंगामाच्या वेळेवर पेरणीसाठी योग्य संधी मिळेल आणि उत्पादनात वाढ होण्याचे आश्वासन मिळेल.
 
गेल्या 50 दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त होते. मात्र, 13 मेपासून मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात घट होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.