पहलगाम नरसंहारप्रकरणी संजय राऊतांचा हल्लाबोल; गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची केली मागणी

    05-May-2025
Total Views |
 
Sanjay Raut Amit Shah
 (Image Source : Internet)
मुंबई :
पहलगाम येथे घडलेल्या नरसंहारानंतर राजकीय वातावरण तापले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. या हल्ल्याला जबाबदार व्यक्ती गृहमंत्रीच आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
 
राऊत म्हणाले की, संकटाच्या काळात सरकारला पाठिंबा देणे म्हणजे या नरसंहारासाठी जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणे होणार नाही. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असताना केंद्र सरकारची भूमिका निष्क्रिय आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 
शरद पवार यांच्या भेटीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की,शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत. आमच्या भूमिकेचा त्यांना आदर असू शकतो, परंतु सरकारसोबत राहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आम्हाला मान्य नाही.
 
“हे सरकार इंदिरा गांधी, राजीव गांधी किंवा मनमोहन सिंग यांच्यासारखं नाही. हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर शोकाचं लवलेशही नाही. अशा सरकारला पाठिंबा म्हणजे देशाशी बेईमानी,” असा घणाघातही त्यांनी केला.
 
गृहमंत्री अमित शाहांनी ‘चून चून के मारेंगे’ असं वक्तव्य केल्यावर राऊत म्हणाले, आमचे २७ जवान मारले गेलेत. तरीही ते खुर्चीवर बसले आहेत. त्यांना तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता.
 
सर्वपक्षीय बैठकीबाबत विचारल्यावर राऊत म्हणाले, मी तिथे गेलो असतो, तर मी तोंडावर अमित शाहांचा राजीनामा मागितला असता. त्यामुळेच मी त्या बैठकीला गेलो नाही.राऊतांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या सरकारच्या काळात पुलवामापासून पहलगामपर्यंत नरसंहार होत आहेत. अशा गृहमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
 
ते पुढे म्हणाले, आम्ही संसदेत अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करू. राज्यसभेत मी आणि लोकसभेत आमचे नेते हे मागणी मांडतील. देशभरात अस्वस्थता आहे, आणि ज्यांना या घटनेचा तिटकारा आहे तेही राजीनामा मागतील.