(Image Source-Internet)
नागपूर :
राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भासह अनेक भागांत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे ठोस पावलं उचलली आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "शेतकऱ्यांना सुरुवातीला १० हजार रुपयांचे तात्पुरते अनुदान देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत नुकसानीचा सविस्तर अहवाल मांडला जाईल, त्यानंतर मदत वितरणाची प्रक्रिया जलदगतीने सुरू केली जाईल."
बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपर्यंत शेती आहे, त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं.
पंचनाम्यांचे आदेश आणि निकषांत बदल, अधिक शेतकऱ्यांना मिळणार मदत-
राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांत पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत राहून राज्य सरकारने मदतीचे निकष सुधारले आहेत. पूर्वी तीन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी मदत मिळत होती, आता ही मर्यादा दोन हेक्टरपर्यंत आणली आहे. त्यामुळे अधिक गरजू शेतकऱ्यांना मदतीचा फायदा मिळणार आहे," असे बावनकुळे यांनी सांगितले.
‘नागपूर पॅटर्न’चा राज्यभर वापर-
शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी ‘नागपूर पॅटर्न’चा अवलंब राज्यभर करण्यात येणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. या पद्धतीत मदतीचा वितरणप्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.