(Image Source- Internet)
नागपूर:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वी १० वीचा निकाल प्रसिद्ध केल्यानंतर, विद्यार्थ्यांमध्ये ११ वीच्या प्रवेशासाठी (XI admission process) उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र या प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहावर विरजण पडले.
प्रवेश प्रक्रियेमध्ये सातत्याने येणाऱ्या अडथळ्यांमुळे, शिक्षण विभागाने प्रवेशासाठी नवे वेळापत्रक घोषित केले आहे. यानुसार आता इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी २६ मे २०२५ पासून सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून सुरू केली जाणार आहे.
पूर्वी ही प्रक्रिया २१ मेपासून सुरू होणार होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे २१ व २२ मे रोजीही प्रवेश सुरू करता आला नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना चार दिवसांची अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नवीन वेळापत्रकानुसार महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे:
२६ मे ते ३ जून: प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत
५ जून: प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर
६ व ७ जून: हरकती नोंदवण्याचा कालावधी
८ जून: अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
या कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार महाविद्यालय निवडण्याची संधी उपलब्ध असेल. यंदा ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबवली जात असून, एकाच अर्जाद्वारे विद्यार्थ्यांना राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येतो. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या अडचणींमुळे सुरळीत प्रक्रिया होण्यासाठी सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.