(Image Source- Internet)
नागपूर:
नागपूरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचा (Itwari Railway Station) पुनर्विकास पूर्णत्वास गेला असून, या नव्या रूपातील स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी पार पडले. या कार्यक्रमात त्यांनी गोंदिया जंक्शनच्या सुधारित स्वरूपाचाही लोकार्पण केला.
१२.३९ कोटींच्या निधीतून बदलले स्थानकाचे रूप; प्रवाशांना अधिक सुविधा-
'अमृत भारत योजना' अंतर्गत १२.३९ कोटी रुपये खर्चून इतवारी स्थानकाचे आधुनिकरण करण्यात आले आहे. या अंतर्गत स्थानकाचा प्रवेशद्वार नव्याने सजवण्यात आला असून, वाहनतळ आणि वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी सुसज्ज प्रतीक्षालये, विश्रांती कक्ष, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा आणि सुरक्षेसाठी अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.
याशिवाय, बुकिंग कार्यालयाचा संपूर्ण पुनर्विकास करण्यात आला असून, प्लॅटफॉर्मवरील छताचा विस्तार आणि विविध प्रवासी-हिताच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे. परिणामी, प्रवाशांना अधिक आरामदायक, सुरक्षित आणि आधुनिक सुविधांनी युक्त रेल्वे स्थानकाचा अनुभव मिळणार आहे.