(Image Source- Internet)
नवी दिल्ली :
जगभरात आर्थिक अनिश्चिततेचं वातावरण असतानाही भारताने स्थिरतेची आणि प्रगतीची दिशा पकडली आहे. रिझर्व्ह बँकेच्या एप्रिल महिन्यातील “अर्थव्यवस्थेची स्थिती” या अहवालात देशाच्या आर्थिक वाढीच्या प्रवासाला सकारात्मक पोषक परिस्थिती असल्याचं चित्र उभं राहिलं आहे.
अहवालानुसार, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील कामगिरी एप्रिलमध्येही दमदार राहिली. देशांतर्गत शेअर बाजाराने सुरुवातीला जागतिक बातम्यांमुळे थोडा डगमगला, पण बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील चांगल्या तिमाही निकालांमुळे पुन्हा उभारी घेतली.
IMF चा मोठा अंदाज – भारत चौथ्या क्रमांकावर
अंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ताज्या अहवालात भाकित करण्यात आलं आहे की २०२५ मध्ये भारत जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरणार असल्याचा पुनरुच्चारही यात आहे.
महागाईवर नियंत्रण, आत्मविश्वास मजबूत-
अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्याने एकूण महागाई आटोक्यात आली आहे. यंदा रब्बी हंगाम चांगला असून, मुसळधार पावसाचा अंदाजही सकारात्मक असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाही बळकटीकरणाच्या दिशेने आहे.
ग्राहक आणि उद्योजक दोघांचाही आत्मविश्वास वाढला आहे – जो आर्थिक गतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
भारत बनतोय जागतिक 'कनेक्टर'-
औद्योगिक धोरणांतील बदल आणि नव्या जागतिक व्यापारसाखळी दरम्यान, भारताला एक 'कनेक्टर देश' म्हणून महत्त्व दिलं जात आहे. विशेषतः तंत्रज्ञान, डिजिटल सेवा आणि औषधनिर्माण क्षेत्रात भारताचा प्रभाव वाढतो आहे.
सोन्याच्या किमतींचा कोअर महागाईवर परिणाम-
महागाईच्या आकडेवारीवर सोन्याच्या वाढत्या किमतींचा परिणाम दिसून येतो आहे. अन्न आणि इंधन वगळता मोजली जाणारी कोअर इन्फ्लेशन अजूनही थोडीशी दबावाखाली आहे, मात्र सोन्याचा प्रभाव वगळल्यास चलनवाढ तुलनेने स्थिर आहे.