(Image Source : Internet)
मुंबई:
‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता आणि मराठमोळा गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका कालावधीनंतर बिग बॉस मराठी ५ मध्ये सहभागी झाल्यापासून त्याला नवी ओळख आणि लोकप्रियता मिळाली. याच पार्श्वभूमीवर एका विशेष मुलाखतीत अभिजीतने आपल्या करिअरबाबत आणि पुढील स्वप्नांबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला.
अभिजीत म्हणतो, "बिग बॉसनंतर आयुष्यात खूप बदल झाले. पूर्वी जे कठीण वाटायचं – म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं, आपलं काम दाखवणं. ते आता सहज झालं आहे. आत्मविश्वास वाढला आहे. आर्थिकदृष्ट्या अडचण कधीच नव्हती, पण आता काम सादर करायला मोकळं व्यासपीठ मिळालं आहे.
अभिनयाच्या दिशेने पावलं-
"माझी अजून बरीच स्वप्नं अपूर्ण आहेत. संगीत तर माझं मुख्य क्षेत्र आहेच, पण आता मला मराठी चित्रपटात अभिनय करायलाही खूप उत्सुकता आहे. तसेच अनेक मोठ्या कलाकारांसाठी गाणं ही एक महत्वाकांक्षा आहे," असं तो पुढे सांगतो.
आताच्या क्षणात जगण्याची शिकवण-
"आता इतकी वर्ष गेल्यानंतर समजतं की भविष्याचं नियोजन जरी महत्त्वाचं असलं, तरी हातातल्या क्षणात काय चांगलं करता येईल, त्यातच खरा आनंद आहे," अशी परिपक्व भावना अभिजीतने व्यक्त केली.
चाहत्यांची उत्सुकता शिगेला-
बिग बॉसनंतर अभिजीत सावंतची लोकप्रियता पुन्हा वाढली असून, त्याचे नवीन प्रोजेक्ट्स, गाणी आणि अभिनयाच्या सुरुवातीबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. लवकरच त्याला नव्या रूपात पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.