(Image Source : Internet)
नागपूर :
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेस (Congress) पक्षाने राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन केले असून, नागपूर शहरातही याचे आयोजन उत्साहात पार पडले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली भारत माता चौकातून शहीद चौकाकडे मार्गस्थ झाली.
या रॅलीत काँग्रेसचे विविध स्तरांवरील पदाधिकारी, युवक व महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. हुतात्मा जवानांना अभिवादन आणि देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी संवाद साधताना आमदार विकास ठाकरे म्हणाले,ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने मिळवलेला विजय हा एका राजकीय पक्षाचा नव्हे, तर आपल्या पराक्रमी जवानांच्या त्यागाचे फलित आहे. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांचा गौरव करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, आणि या विषयावर राजकारण करणे हे अत्यंत खेदजनक आहे. भाजपकडून रॅलीवर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही तिरंगा रॅली काढली आहे. यातून राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला जातोय. मात्र, भाजपला यातही राजकीय हेतू दिसतो, हे दु:खद आहे. काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य आणि प्रगतीसाठी केलेल्या योगदानावर पांघरूण घालण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.