साताऱ्यात भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष? महिला उमेदवारांचीही जोरदार दावेदारी

    02-May-2025
Total Views |
 
BJP
 (Image Source : Internet)
सातारा :
साताऱ्यात भाजपच्या (BJP) संघटन पर्वत २ उपक्रमाअंतर्गत जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेने वेग घेतला असून, इच्छुकांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याची शक्यता चर्चेत आली आहे. सोमवारी कऱ्हाडमध्ये प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि निरीक्षक आमदार हेमंत राहणे यांनी स्थानिक नेते, पदाधिकारी आणि इच्छुकांची मते जाणून घेतली. त्यानंतर बंद लिफाफ्यातील नाव २ मे रोजी वरिष्ठांकडे सादर केले जाणार आहे.
 
सातारा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने इतर काही जिल्ह्यांप्रमाणे येथेही कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी दोन जिल्हाध्यक्ष नेमले जावेत, अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे. सध्या सांगलीला ३, सोलापूरला ३ आणि कोल्हापूरला ४ जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे साताऱ्यातही त्या धर्तीवर बदल होण्याची शक्यता आहे.
 
यावेळी महिलाही स्पर्धेत उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. चित्रलेखा माने आणि सुवर्णा पाटील या दोघींनीही आपली उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांना २५ टक्के प्रतिनिधित्व देण्याचे धोरण स्वीकारले असल्याने, साताऱ्यातील जिल्हाध्यक्षपदी महिलेला संधी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
दुसरीकडे, धैर्यशील कदम, सुनील काटकर आणि रामकृष्ण वेताळ यांची नावेही चर्चेत आहेत. कार्यकर्त्यांच्या पसंतीनुसार निवडले जाणारे नाव अंतिम निर्णयासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाधीन केले जाणार आहे. त्यामुळे २ मे रोजी कोण जिल्हाध्यक्षपदी विराजमान होणार आणि किती जणांची नेमणूक होणार, याची उत्सुकता भाजपच्या गोटात शिगेला पोहोचली आहे.