(Image Source : Internet)
नागपूर :
राज्यातील उन्हाळ्याने हैराण झालेल्या जनतेला अखेर पावसाच्या (Rain) सरींचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ मेपासून २५ मे दरम्यान महाराष्ट्रात विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ २२ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, त्याचा परिणाम म्हणून कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात २१ आणि २२ मे रोजी ३५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. यासोबतच मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि जोरदार वारे यांचा अनुभव अनेक भागांना येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट-
१९ मे रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, बीड, जालना, परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, लातूर, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असून, जोरदार वारे देखील वाहू शकतात.
नाशिकसह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट-
नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात मागील पाच दिवसांत दोन टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणात ४६.४१ टक्के पाणीसाठा असून, यावर्षी याच दिवशी ४४.४० टक्के पाणी होते. अवकाळी पावसामुळे धरणाच्या साठ्यात वाढ झाली असून, नाशिक शहरातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. यानंतर मान्सून वेळेवर दाखल झाल्यास पाण्याचा संभाव्य तुटवडा टळण्याची शक्यता आहे.