नागपूरात उष्णतेचा कहर; ऊष्माघाताने तीन व्यक्तीच्या मृत्यूची माहिती

    22-Apr-2025
Total Views |
 
Heatwave nagpur
 (Image Source : Internet)
नागपूर :
नागपूर (Nagpur) शहरात उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले असताना, ऊष्माघाताने तिघा अज्ञात व्यक्तींचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये शहरातील विविध भागांमध्ये हे प्रकार घडले असून, तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
 
पहिली घटना २२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली. शितला माता मंदिर परिसरात अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील एका पुरुषाला अचेत अवस्थेत आढळले. त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (GMCH) नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी दाखल करताच मृत घोषित केले.
 
दुसरी घटना २० एप्रिल रोजी दुपारी अग्रसेन चौकात घडली. सुमारे ५० वर्षीय पुरुष बेशुद्ध स्थितीत आढळून आला. उपचारादरम्यान त्याचा २१ एप्रिलच्या पहाटे मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद तहसील पोलीस ठाण्यात झाली आहे.
 
तिसरी घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी आठच्या सुमारास गांधी बाग कापड बाजार परिसरात घडली. तेथे सापडलेल्या सुमारे ५० वर्षाच्या एका अनोळखी व्यक्तीला मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
तिन्ही प्रकरणांमध्ये कोणतीही जखम किंवा मारहाणीची चिन्हे आढळलेली नसल्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार मृत्यूचे कारण ऊष्माघात असावे, असा पोलिसांचा संशय आहे. पोलीस विभागाने आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. मृतांची ओळख पटवण्याचे तसेच मृत्यूमागील नेमकी कारणमीमांसा करण्याचे काम सुरू आहे.