(Image Source : Internet)
मुंबई :
राज्यातील अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ व विनामूल्य वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. वरळी येथील राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीदरम्यान त्यांनी हे निर्देश दिले.
या बैठकीत ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत रुग्णालयांना दिले जाणारे निर्देश स्पष्ट करण्यात आले. अपघातामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी सहभागी रुग्णालयांनी 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस सेवा द्यावी, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्री म्हणाले की, उपचाराच्या अभावामुळे कुणाचा जीव जाऊ नये, हीच आपली प्राथमिकता आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतर तत्काळ उपचार मिळणे आवश्यक आहे. यासोबतच, रुग्णालयांनी या योजनांचा योग्य उपयोग करून रुग्णसेवा प्रभावीपणे पुरवावी, असेही ते म्हणाले.