(Image Source : Internet)
मुंबई:
राज्यातील सत्तांतरानंतर राजकीय वाद-विवाद पुन्हा जोर धरताना दिसत आहेत. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पुन्हा एकदा सत्तेचा भाग व्हायची इच्छा आहे, पण सत्ताधाऱ्यांकडून त्यांना प्रवेश मिळत नसल्याने ते टीकेचा मार्ग स्वीकारत आहेत.
संजय राऊतांवर निशाणा-
चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत सातत्याने अमित शाह यांच्यावर टीका करत आहेत. पण त्यांनी इतकाच वेळ महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांवर दिला असता, तर कदाचित त्यांचं पक्षही बळकट झालं असते. अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर ५०० पानी अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केल्याचं सांगत पाटील म्हणाले, “हे पुस्तक वाचल्यानंतर टीका करणाऱ्यांना अमित शाह यांच्या ज्ञानाची जाणीव होईल. इतिहास फक्त बोलण्याने नव्हे तर अभ्यासाने समजतो.
महापालिका निवडणुकीत अडचण-
पुढे बोलताना पाटील म्हणाले, जर शिवसेनेने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत संवाद साधला नाही, तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांना उमेदवार शोधणंही कठीण होईल.राज्यातील विद्यमान सरकार जनतेच्या हितासाठी काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व हे सर्वसमावेशक आहे. जाती-पातीत न अडकता त्यांनी सर्व समाजासाठी निर्णय घेतले आहेत, असे म्हणत पाटील यांनी फडणवीस यांचे समर्थन केले.