(Image Source : Internet)
मुंबई :
नागपुरात झालेल्या हिंसाचारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या प्रकरणावर भाष्य करत सरकारमधील एका मंत्र्याला लक्ष्य केले.
महाराष्ट्र सरकारमधील एक विषारी मंत्री दररोज समाजात द्वेष पसरवण्याचं आणि विभाजन करण्याचं काम करत आहे. महाराष्ट्रात दोन समाजात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरूनही लोक आणले जात आहे. नागपूर दंगलही हा एका मोठ्या कटाचा भाग आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता केला आहे.
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले .सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला.यामध्ये पोलीसकर्मी आणि नागरिक जखमी झाले. तसेच अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.