(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे (Ayodhya Ram Temple) २२ जानेवारी २०२४ रोजी लोकार्पण केले. भगवान श्रीरामाचा भव्य- दिव्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. यातच इतक्या कमी कालावधीतअयोध्येतील श्रीराम मंदिर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत मंदिर बनले.
या एका वर्षांत अयोध्येने अनेक विक्रम प्रस्थापित केले. रामनगरी अयोध्येत विक्रमी संख्येने भाविक पोहोचत आहेत. दानधर्मात राम मंदिराने वैष्णोदेवी आणि शिर्डी साई मंदिरांना मागे टाकले आहे. राम मंदिर हे भाविकांची पहिली पसंती बनत आहे.
गेल्या वर्षभरात १३ कोटींहून अधिक लोक अयोध्येत पोहोचले आहेत. दानधर्मात आंध्र प्रदेशातील तिरुपती वेंकटेश्वर मंदिर भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दरवर्षी या मंदिरात १५०० ते १६५० कोटी रुपयांच्या दान, देणग्या दिल्या जातात. दुसऱ्या क्रमांकावर केरळचे पद्मनाभस्वामी मंदिर आहे. या मंदिरात वार्षिक ७५० ते ८०० कोटींचे दान भाविकांकडून दिले जाते. यानंत आता राम मंदिर तिसऱ्या स्थानावर पोहोचले असून, एका वर्षात ७०० कोटी रुपयांचे दान मिळाल्याचे सांगितले जात आहे.
देशातील 'या' मंदिरांनाही मिळते कोट्यवधींचे दान -
चौथ्या क्रमांकावर पंजाब अमृतसर येथे असलेले सुवर्ण मंदिर आहे. येथे वार्षिक ६५० कोटी रुपयांची दान दिले जाते. पाचव्या क्रमांकावर जम्मू आणि काश्मीरचे वैष्णोदेवी मंदिर आहे. दरवर्षी येथे ६०० कोटी रुपयांचे दान या मंदिरात दिले जाते. सहाव्या क्रमांकावर महाराष्ट्राचे शिर्डी साई बाबा मंदिर आहे. दरवर्षी या मंदिरात ५०० कोटी रुपयांचे दान दिले जाते. सातव्या क्रमांकावर ओडिशामध्ये असलेले पुरी येथील जगन्नाथ मंदिर असून, येथे ४०० कोटी रुपयांचे दान दिले जाते. आठव्या क्रमांकावर नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आहे. येथे दरवर्षी २०० ते २५० कोटी रुपयांचा निधी येतो. नवव्या क्रमांकावर गुजरातमधील सोमनाथ मंदिर आहे. येथे १५० ते २०० कोटी रुपयांच्या दान, देणग्या दिल्या जातात.