Image Source;(Internet)
मुंबई :
राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतून मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून सरकारचे लक्ष एका गंभीर सामाजिक प्रश्नाकडे वेधले आहे. गेल्या दहा महिन्यांत मुंबईत मुलींच्या अपहरणाचे तब्बल १,१८७ गुन्हे दाखल झाले असून, दररोज सरासरी चार ते पाच मुली गायब होत असल्याची धक्कादायक वास्तव त्यांनी मांडले आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतक्या गंभीर विषयांवर चर्चा होत नसताना अधिवेशन नेमकं कशासाठी, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
पत्रात राज ठाकरे म्हणतात, महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं आणि बेपत्ता होण्याचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ या कालावधीत हे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहे. मुलांना पळवून नेऊन कामाला जुंपणाऱ्या, भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या उघडपणे कार्यरत आहेत. मात्र, यावर सरकारकडून नेमकी कोणती ठोस कारवाई सुरू आहे, हे स्पष्ट होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरकारी आकडेवारीत अमुक इतकी प्रकरणं दाखल झाली आणि त्यातील इतकी टक्के मुलं शोधून काढली गेली, एवढ्यावर विषय संपवण्याची मानसिकता चुकीची असल्याचं राज ठाकरे यांनी ठामपणे नमूद केलं. अनेक पालक तक्रार नोंदवायलाच पोहोचत नाहीत, हे वास्तव सरकारच्या आकडेवारीत दिसत नाही. शिवाय, मुलं सापडली तरी त्या काळात त्यांच्या मनावर होणाऱ्या मानसिक आघाताचं काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
रस्त्यावर, स्टेशनवर आणि बसस्थानकांवर भीक मागणारी लहान मुलं नेमकी कोणाची आहेत, त्यांच्यासोबत असलेली माणसं खरंच त्यांची पालक आहेत का, याची तपासणी करण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी पत्रात स्पष्ट केलं. गरज पडल्यास डीएनए चाचण्यांचे आदेश देण्याइतकी कडक भूमिका सरकारने घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात लहान मुलं, तरुण मुली पळवल्या जात असताना आणि जमिनी बळकावल्या जात असताना, या विषयांवर विधिमंडळात गंभीर चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनाही या प्रश्नांवर एकत्र येऊन ठोस पावलं उचलावीत असं वाटत नाही का, असा परखड सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशन हे केवळ चुकलेल्या अंदाजपत्रकावर पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यापुरतंच मर्यादित राहिलं आहे का, असा टोला लगावत अनेकदा मंत्रीच सभागृहात उपस्थित नसतात, ही स्थिती गंभीर असल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे बेपत्ता मुलं आणि मुलींच्या प्रश्नावर चर्चा होईल अशी अपेक्षा ठेवणंही अवाजवी वाटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पत्राच्या शेवटी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही अप्रत्यक्ष टीका केली. हा विषय सर्व राज्यांशी चर्चा करून संयुक्त कृतिगट तयार करण्यासारखा आहे. मात्र, सध्या वंदे मातरमसारख्या विषयांवर आक्रमक चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येतो आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालून, केवळ अधिवेशनातील चर्चेपुरतं न थांबता ठोस आणि परिणामकारक कृती करावी, हीच महाराष्ट्राची अपेक्षा असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत मांडलं आहे.