प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान; पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाराणसीतून चार नव्या सेवांचे लोकार्पण

08 Nov 2025 14:42:13
 
PM Modi inaugurated Vande Bharat Train
 Image Source:(Internet)
वाराणसी :
देशाच्या पायाभूत विकासाला गती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आज वाराणसीहून चार नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवांचे लोकार्पण केले. “वंदे भारत ही भारतीयांची, भारतीयांनी आणि भारतीयांसाठी बनवलेली ट्रेन आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे,” असे मोदी म्हणाले.
 
पायाभूत सुविधा हे प्रत्येक विकसित देशाच्या आर्थिक वाढीचे मुख्य कारण ठरले असून भारतही या दिशेने झपाट्याने प्रगती करत आहे, असे मोदींनी सांगितले. “एखाद्या शहराला चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली की त्याचा विकास वेगाने होतो. वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत या योजना भारतीय रेल्वेचे रूपांतर घडवत आहेत. हा भारतीय रेल्वेच्या नव्या युगाचा पाया आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
 
वाराणसीत झालेल्या या सोहळ्यात मोदींनी काशी ते खजुराहो, फिरोजपूर-दिल्ली, लखनऊ-सहारनपूर आणि एर्नाकुलम-बेंगळुरू या चार नव्या वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या सेवांमुळे देशातील वंदे भारत गाड्यांची संख्या आता १६० हून अधिक झाली आहे.
 
काशीला येणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. “काशीला आलेले भाविक आता खजुराहो, प्रयागराज आणि चित्रकूट यांसारख्या धार्मिक स्थळांपर्यंत सहज पोहोचू शकतील. एनडीए सरकारने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून देशाच्या विकासाला नवे गतीमान मिळेल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
 
मोदींनी शेवटी नमूद केले की, “वंदे भारत केवळ रेल्वे नव्हे, तर नव्या भारताच्या वेगवान प्रवासाचे प्रतीक आहे.”
Powered By Sangraha 9.0