Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील सरकारी जमिनीच्या विक्रीत अनियमितता केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हा व्यवहार थेट फसवणुकीचा असल्याचे सांगत, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, सरकारी जमीन खाजगी व्यक्तींच्या नावावर जाणे हे गंभीर प्रकरण आहे. या व्यवहारामागे सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “जेव्हा जमीन शासनाच्या नावे होती, तेव्हा ती विक्री कशी काय झाली?”
काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणात काही व्यक्तींनी पावर ऑफ अटर्नीच्या आधारे बेकायदेशीररित्या जमीन विकल्याचा आरोप करत, “ही कृती सरळ फसवणुकीसारखी आहे,” असे म्हटले.
तसेच, वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील ईडी आणि सीबीआयच्या निष्क्रियतेवरही प्रश्न उपस्थित केले. “सत्ताधाऱ्यांशी संबंधित व्यक्तींवर आरोप झाले की तपास यंत्रणा मौन धारण करते का?” असा सवाल त्यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी असा दावाही केला की, या व्यवहारात लाखो कोटींच्या जमिनींचा घोटाळा दडलेला आहे आणि चौकशी झाल्यास संपूर्ण राज्य हलवून टाकणारे सत्य समोर येईल. त्यांनी सरकारला आव्हान दिले की, “राजकीय दबावाला बळी न पडता प्रामाणिक चौकशी करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार आहे.