संविधान दिनी राष्ट्रपतींचा संदेश;विकसित भारताचा संकल्प आता वास्तवाच्या उंबरठ्यावर!

26 Nov 2025 14:07:19
 
President Draupadi Murmu
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
देशभरात संविधान दिनाचा (Constitution Day) उत्साह उसळला असताना, जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात भव्य राष्ट्रीय कार्यक्रम पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अध्यक्षस्थानी असून, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य आणि दोन्ही सभागृहांचे खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू यांनी संविधानाच्या नऊ भारतीय भाषांतील अनुवादित आवृत्त्यांचे प्रकाशन करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मिरी, तेलुगू, ओडिया आणि आसामी भाषांतील संविधानाचे संकलन प्रथमच अधिकृतरीत्या जनतेसमोर आले.
 
या निमित्ताने राष्ट्रपतींनी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. त्या क्षणी संपूर्ण सभागृहात एकात्मतेचा आणि अभिमानाचा अनुभव पसरला.
 
राष्ट्रपती म्हणाल्या, “भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आदर्श ठरला आहे. गेल्या दशकात संसदेनं केलेल्या कामगिरीने लोकशाहीची पाया आणखी मजबूत केला आहे.” तिहेरी तलाकसारखी प्रथा बंद करून महिलांना न्याय मिळवून देण्याच्या निर्णयासह अनेक ऐतिहासिक घडामोडींचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
 
“विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्णत्वास जाईल,” असा ठाम विश्वास व्यक्त करत राष्ट्रपती मुर्मू यांनी नागरिकांना संविधानातील मूल्ये जपण्याचे आवाहन केले.
 
त्या पुढे म्हणाल्या, “२६ नोव्हेंबर १९४९ हा आपल्या इतिहासातील सुवर्णक्षण. याच सभागृहात संविधान सभेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले. तेच आज आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचे मार्गदर्शक आहे.”
 
संविधान दिनाच्या या औचित्यपूर्ण सोहळ्यात राष्ट्रपतींनी लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग, नैतिक जबाबदारी आणि संविधानातील तत्त्वांना निष्ठा राखण्याचे महत्व स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0