बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली सक्रिय; दक्षिणेकडील 'या' राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

26 Nov 2025 17:56:05
 
Bay of Bengal
 Image Source:(Internet)
नागपूर :
देशात पुन्हा एकदा हवामानाचा ताण वाढू लागला असून बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार होत असलेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
 
IMDच्या ताज्या माहितीनुसार, उपसागराच्या आग्नेय भागात वेगाने सक्रिय होणारे ढगांचे वादळ पुढील २४ ते ३६ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली हळूहळू तीव्र होत पश्चिम दिशेने सरकू शकते, ज्याचा थेट परिणाम तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी-माहे, आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीप बेटांवर दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
किनारपट्टीच्या भागात उंच लाटा, खवळलेला समुद्र आणि जोरदार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे मच्छिमारांनी पुढील काही दिवस समुद्र प्रवास टाळावा, असा कडक इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही भागांत वीजांच्या कडकडाटासह अचानक पावसाचेही संकेत देण्यात आले आहेत.
 
अनेक राज्यांत नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आंध्र प्रदेशात आधीच मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, केरळातही अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आगामी आठवड्यात दक्षिण भारतातील हवामान अधिक अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
 
हवामान बदलामुळे ही अस्थिरता वाढत असून, राज्य प्रशासनांनी सतर्क राहण्याचे निर्देश स्थानिक नागरिकांना दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0