सहमतीचे नाते तुटले म्हणून तो गुन्हा होत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

26 Nov 2025 12:02:58
 
Supreme Court
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
परस्पर संमतीने सुरू झालेल्या प्रेमसंबंधांचा शेवट झाला म्हणून त्याला गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न होऊ शकत नाही, असा स्पष्ट निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका महत्त्वाच्या निर्णयातून मांडला. एका वकिलाविरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणात कोर्टाने गुन्हा रद्द करत स्पष्ट केले की, स्वेच्छेने जुळलेले नाते तुटणे हा ‘बलात्कार’ ठरू शकत नाही.
 
या सुनावणीत खंडपीठाने हे नमूद केले की संबंधांची सुरुवात, नात्याचा प्रवास आणि त्यामधील संमती हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात. जर नाते स्वेच्छेने बांधले गेले असेल आणि अनेक वर्षे ते तसंच टिकले असेल, तर त्याच्या शेवटी निर्माण झालेला वाद गुन्हेगारी स्वरूपात रंगवता येत नाही.
 
सदर प्रकरणात तक्रारदार महिलेचे म्हणणे होते की वकिलाने लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र नात्याच्या कालावधीकडे आणि दोघांमधील परस्पर संबंधांकडे पाहता ही तक्रार वैयक्तिक मतभेदातून निर्माण झाल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आले. जबरदस्ती किंवा दबावाचा कोणताही ठोस आधार न आढळल्याने सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय बाजूला सारत गुन्हा रद्द केला.
 
या निर्णयातून न्यायालयाने स्पष्ट केले की, संमतीने जुळलेले नाते तुटले म्हणून ते गुन्हा ठरत नाही; नात्यातील निराशा किंवा ताणतणाव ही गुन्हेगारी कारवाईची कारणे नाहीत.
Powered By Sangraha 9.0